रस्त्यातील खड्डे भरण्यात ५ करोड रुपयांचा घोटाळा

 



उल्हासनगर- स्थायी समितीत चार प्रभाग क्षेत्रामधील रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी दोन कोटी रुपयांची मान्यता दिली असताना हे काम साडे सात कोटी पर्यंत वाढविले असल्याने ह्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत भाजपने थेट आयुक्तांना लक्ष्य केले.यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उल्हासनगर शहरातील ७० किलोमीटरच्या डांबरी रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य पसरले होते. ह्या रस्त्यांमध्ये पालिकेने पावसाळयात ग्रीड आणि खाडी टाकून कसेबसे दिवस ढकलले. पावसाळा संपता संपता स्थायी समितीत प्रत्येक प्रभागातील खड्डे भरण्यासाठी ५० लाखाच्या चार निविदा काढण्यात आल्या. हे काम करणाऱ्या झा. पी. कंपनीने १६ रस्त्यांचे काम हाती घेतले. हे काम पूर्ण होता होता किंमत साडे सात कोटी पर्यंत वाढली असल्याची माहिती नगरसेवक जीवन ईदनानी खड्डे भरण्यासाठी यांनी महासभेत देत एकच खळबळ उडवून दिली. त्यांच्या ह्या आरोपांचे प्रदीप रामचंदानी, किशोर वनवारी, मनोज लासी, प्रकाश नाथानी आदी नगरसेवकांनी समर्थन केले. याबाबत माहिती देताना शहर अभियंता महेश सीतलानी यांनी १६ रस्त्यांचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. या कामाला स्थायी समितीने मान्यता दिली होती. मात्र त्या रक्कमेत काम पूर्ण होत नसल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियम ७३ क आणि ड, ५.२.२. अंतर्गत पालिका आयुक्तांनी वाढीव कामाला मान्यता दिली आहे. तसेच जनहित याचिके अंतर्गत न्यायालयाने शहर खड्डे मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अंतर्गत हे काम जोमाने चालू असल्याचे सितलानी यांनी सांगितले.